कृषीवार्ता
बेलपिंपळगाव येथे सोयाबीन शेती दिन उत्साहात साजरा
शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने शेती करावी; डॉ. कौशिक यांचे आवाहन

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : भारतीय अर्थव्यवस्था शेती व शेतीवर आधारित व्यवसायावर अवलंबुन आहे. शेती आणि शेती विकासासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने शेती करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक यांनी केले.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्रात स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने दि. २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दरम्यान दिनांक २४ सप्टेंबर रोजी रमेश शिंदे, बेलपिंपळगाव ता. नेवासा येथे सोयाबीन पिक शेती दिन व रब्बी पिके कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काकासाहेब शिंदे, विश्वस्त श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडे, धनंजय हिरवे, तालुका कृषि अधिकारी, नेवासा, कृष्णा शिंदे, सरपंच, बेल पिंपळगाव हे उपस्थित होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांच्या गत १२ वर्षांमधील उपलब्धतेबाबत व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत राबविण्यात आलेल्या सोयाबीन एकात्मिक पिक व्यवस्थापन बद्दल माहिती दिली.
तसेच डॉ. कौशिक यांनी कांदा तंत्रज्ञान लागवड याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. विषय विशेषज्ञ इंजी राहुल पाटील सोयाबीन प्रक्रिया उद्योग तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरण विषयी मार्गदर्शन केले. नारायण निबे यांनी रब्बी ज्वारी व हरभरा एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी दिलीप कुलकर्णी यांनी स्वतः चे सोयाबीन पिक विषयी आपले मनोगत व्यक्त करताना दहिगाव ने येथील कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत सोयाबीन समुह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिकाचे माध्यमातून अतिशय चांगले काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी काकासाहेब शिंदे यांनी सोयाबीन पिक उत्पादनातील बारकावे व ऊस उत्पादनातील महत्त्वाचे टप्पे या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी दिगंबर शिंदे, माजी सभापती, दिगंबर शिंदे सर, विठ्ठल जाधव, दिलीप कुलकर्णी, निवृत्ती जाधव, पत्रकार अशोक तुवर, रमेश शिंदे तसेच कृषि पर्यवेक्षक निलेश बिबवे, श्रीमती. पुजारी व वैराळ हे उपस्थित होते. सुत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले तर प्रकाश बहिरट यांनी आभार मानले.