नेवासा तालुक्यावर ‘आसमानी संकट’
वीज पडून दोन ठार; शेतमजुर महिला व शेतकर्याचा मृत्यू, तालुक्यात हळहळ
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शेतामध्ये कांदा काढण्याचे काम करीत असलेल्या 42 वर्षीय शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सविता राजू बर्फे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जेऊर रस्त्यावरील तांबे वस्ती येथे भास्कर तांबे यांच्या शेतामध्ये कांदे काढण्याचे काम काही महिला करत होत्या. कांदे काढण्याचे काम सुरू असतांना सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास आकाशामध्ये ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. कांदे काढणार्या महिलांची आडोश्याकडे जाण्यासाठी पळापळ सुरु झाली. तेवढ्यात आडोश्याकडे जात असलेल्या सविता राजू बर्फे (वय 42 वर्षे) यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा शेतातच दुर्दैवी मृत्यू झाला.
नेवासा तालुक्यात वीज पडण्याची दुसरी घटना अंमळनेर येथे घडली. शेतामध्ये काम करीत असलेल्या शेतकर्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास झाली. रावसाहेब भागुजी बोरूडे (वय 54) असे या शेतकर्याचे नाव आहे. सायंकाळी पाच-साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार वार्यासह ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला अंमळनेर येथे सुरुवात झाली. याच वेळी या शेतकर्यावर दुर्देवी प्रसंग ओढावला.
शेतामध्ये काम करत असताना वीज पडून झालेल्या या दोन्ही दुर्घटनेबद्दल तालुक्यातून शोक व्यक्त केला जात आहे.