google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

देवगड येथे दत्तजयंती उत्सव सोहळयाची सांगता

हभप भास्करगिरी महाराजांचे काल्याचे किर्तन; राष्ट्र व समाज हित जोपासण्यासाठी मतभेदाच्या वहाना बाजूला ठेवा- हभप भास्करगिरी महाराज

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे सप्ताहभर चाललेल्या दत्तजयंती उत्सव सोहळयाची गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या  काल्याच्या किर्तनाने व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली. कोण कोणत्या जातीचा आहे, पंथाचा आहे, हे न पाहता राष्ट्रहित व समाजहित जोपासण्यासाठी मतभेदाच्या वहाना बाजूला ठेवा तसेच देव देश व धर्माबद्दल असलेली निष्ठा कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. दुःखात असणाऱ्याला  सुखात आणण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी केले.
      
               ज्ञानसागर गुरुवारी झालेल्या दत्तजयंती उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की आठ दिवस चाललेला सप्ताह म्हणजे आईच्या पदराखाली मुलाला होणाऱ्या आनंदाप्रमाणे आहे. तो आनंद आपल्याला श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या कृपा छत्राखाली आपण उपभोगला  आहे. पारायण, किर्तनासह दत्त याग सारखे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडली याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानत धन्यवाद दिले. जीवनात चांगले कर्म व्हावे म्हणूनच सप्ताह व जयंती सारखे सोहळे आपण साजरे करतो, यासाठी देवाची ही कृपादृष्टी असावी लागते. कितीही साधना केली तरी ती फलद्रुप होत नाही. भगवंत आपला व आपण भगवंतांचे हे सूत्र सतत ध्यानी ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
    
               यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात त्यांनी भगवान परमात्म्याचे जीवन कार्य व लीला यावेळी बोलतांना विषद केल्या दुर्जनांचा संहार व भक्तांचे रक्षण करण्याचे काम भगवान परमात्म्याने केले. धर्माकडून आपली हानी होऊ नये यासाठी धर्माचे चिंतन व अभ्यास करा, मानवतेला तडा जाऊ देऊ नका, देवाविषयी असलेली भावना बदलू देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
     
                यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या  काल्याची दहीहंडी फोडून आठ दिवस चाललेल्या दत्तजयंती उत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी झालेल्या सांगता प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, मा. आ अण्णासाहेब माने, हभप मते महाराज, कोंडीराम महाराज पेचे, अतुल महाराज आदमने, संतोष महाराज चौधरी, योगीराज महाराज पवार, ज्ञानदेव लोखंडे, बाळकृष्ण महाराज कानडे, रामनाथ महाराज पवार, नारायण महाराज ससे, लक्ष्मण महाराज नांगरे, बाबासाहेब महाराज सातपुते, पंढरीनाथ महाराज मिस्तरी, संतसेवक लक्ष्मीनारायण जोंधळे, बाळासाहेब पाटील, संतसेवक अर्जुन वरखडे, सरपंच अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले, संतसेवक बजरंग विधाते, गायक रामजी विधाते, संतोष काळे, बद्रीनाथ फोलाणे, चांगदेव साबळे, महेंद्र फलटणे, पुणे येथील संतसेवक रविंद्र मुनोत, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, कचरू भागवत, भारत लंघे, माधव आहेर, वाल्मिक सोनवणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    
               यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दत्तजयंती व त्यानंतर आलेल्या गुरुवारी देवगडला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह पोलीस बांधवांचा तसेच होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे व होमगार्ड जवान यांनी बंदोबस्तासाठी उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचा यावेळी श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

सत्काराऐवजी बिस्किटे पुडे आणा-
सदरच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी अनेकांनी गुरुवर्य भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी यांचे संतपूजन केले. मोठ मोठे हार पाहून गुरुवर्य बाबा म्हणाले की हारा ऐवजी येणाऱ्या भाविक व लहान मुलांना देण्यासाठी बिस्किटे पुडे आणल्यास ते उपयोगी पडतील, असे सांगताच उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!