कृषीवार्ता
शेतकऱ्यांना मिळणार १५ हजारांचा सन्मान निधी
पाच वर्षे वीज बिलमाफी; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

स्वराज न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आता लवकरच राज्य शासनामार्फत तीन हजारांची भर घातली जाणार असून, शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक १२ हजारऐवजी १५ हजार रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सोमवारी वनामती येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. सोबतच, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले असून, पुढील पाच वर्षे त्यांना वीज बिल येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेंतर्गत १९ वा हप्ता वितरण समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
देशभरातील ९.८० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत २२ हजार कोटी रुपयांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीस म्हणाले, या योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वितरित करते. तसेच राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. आता राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करणार असून, राज्यामार्फत ९ हजार आणि केंद्र शासनाचे ६ हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली, तेव्हा त्यावर टीका झाली.
आज शेतकऱ्यांच्या अडचणीत हेच पैसे कामात येत आहेत. मीही मुख्यमंत्रपिदाच्या कारकिर्दीत जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली. आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल. यावर ६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. कृषी सोलर पंप योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत तीन लाख कनेक्शन देण्यात आली. त्यासाठी माझ्या सरकारकडून शेतकऱ्यांना विमा कवचही देण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी समर्पित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या कार्यक्रमात प्रयोगशील, उद्योजक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.