कृषीवार्ता
आधुनिक शेती’मध्ये जमिनीच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या
कृषी शास्त्रज्ञ डॉ ढगे यांचे प्रतिपादन

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील गोपाळपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालय अंतर्गत संजीवनी पंधरवडा शेतकऱ्यांमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
विविध उपक्रमापैकी जमीन सुपीकता जागृती दिन हा उपक्रम गोपाळपूर येथे साजरा करताना कृषी शास्त्रज्ञ डॉ ढगे म्हणाले की आधुनिक शेती तंत्रज्ञानामध्ये जमिनीचे आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे कारण पीक उत्पादन वाढीमध्ये जमिनीची सुपीकता अत्यंत महत्त्वाची आहे. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म चांगले असतील तर त्या जमिनीची सुपीकता चांगली असते. त्यामुळे उत्पादकता वाढते. त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय व रासायनिक तसेच जैविक खतांचा वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा वापर करण्यासाठी माती तपासणी करून शिफारशीप्रमाणे वापरावीत. जमिनीची सुपीकता ही कणांची रचना; पाणी धरून ठेवण्याची क्षमता; अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी जमिनीची क्षमता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. शेतकऱ्यांनी माती तपासणी करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. क्षारयुक्त जमिनीसाठी तपासणीनुसार जिप्सम व गंधकयुक्त खतांचा वापर करावा. जमिनीची सुपीकता वाढविल्यास पीक भरघोस व जोमदार येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची शास्त्रीय माहितीनुसार साधक बाधक ओळख करून घेणे ही काळाची गरज आहे, असे विचार डॉक्टर ढगे यांनी विशद केले.
कृषी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सचिन ढोकणे होते. कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन पिक विमा व इतर योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाला अमोल आगळे, नितीन ढोकणे, निलेश आगळे, काकासाहेब घुले, कृष्णा ढोकणे, योगेश देऊतकर व महेश रासकर तसेच गोपाळपूरचे शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक वैभव कदम यांनी केले. ऋणनिर्देश कृषी सहाय्यक संदीप गायकवाड यांनी केले. याप्रसंगी ऊस पिकाची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर ढगे यांच्या समवेत सर्व शेतकरी बंधूंनी करून जमिनीच्या सुपीकतेबाबत सविस्तर चर्चा केली.