
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तिसगाव तालुका पाथर्डी येथील राहणाऱ्या कल्याण देविदास मरकड या युवकाचा मृतदेह प्रवरासंगम येथे गोदावरी नदीच्या पात्रात सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मिळून आला असून या युवकाचा गोळी झाडून खून केल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याबाबत नागरिकांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना माहिती दिली होती. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर कपाळावर खोल भोक असलेली जखम दिसून आल्याने सदर युवकाचा खून झाल्याचा दाट संशय आहे.
तपासाची चक्रे वेगाने फिरवुन सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत असता तिसगाव येथील राहणारा कल्याण मरकड हा व्यक्ती 1 नोव्हेंबरच्या रात्री पासून गायब झाला असून याबाबत त्याचा भाऊ प्रसाद मरकड रा. तिसगाव याने पाथर्डी पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. 129/2024 अन्वये नोंद केली असल्याचे दिसून आले.
नेवासा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे आणण्यात आला परंतु कपाळावर खोल भोक असलेली जखम असल्याने सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवण्यात आला होता, परंतु सदरची जखम ही एखाद्या अग्नीशास्त्राने केली असावी असा दाट संशय आल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालय संभाजीनगर येथे पाठवण्यात आला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना तपासाबाबत सूचना दिल्या. दरम्यान या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी देखील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथके रवाना केली आहेत. सदर घटनेचा उलगडा लवकरच करू असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण मरकड याचा खून झाल्याबाबत मृतकाचा चुलत भाऊ प्रसाद मरकड याने रात्री उशिरा पंकज राजेंद्र मगर व ईरशाद जब्बार शेख (दोन्ही रा. तिसगाव ता. पाथर्डी) यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.