स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पिकांना जीवदान देणारा ठरला आहे. तथापि प्रत्येक पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार आहे. कारण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये फार मोठा पावसाचा खंड पडला होता. पिकांच्या नाजूक व संवेदनशील अवस्थेमध्ये पावसाचा ताण बसल्यामुळे कपाशी व सोयाबीन तसेच तुर व बाजरी आणि उसाच्या उत्पादन 50 टक्के घट येऊ शकते. त्यामुळे पिक विमा कंपन्यांनी अग्रमी रक्कम म्हणून शेतकऱ्यांना सर्व पिकासाठी 50 टक्के हप्ता द्यावा. सरसकट सर्व पिकांना विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी कारण वस्तुस्थितीमध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी ढगफुटीमुळे उदाहरणार्थ पाचेगाव परिसरात पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.
या पावसाचा उपयोग काही प्रमाणात झाला आहे. अन्यथा शेती व शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाले असते. शिवाय चारा पिकांचा प्रश्न गंभीर झाला असता. सर्वसामान्यांना पिण्याचे पाण्यापासून खूप हाल झाले असते. पाऊस पडल्यानंतर पाण्याचे संवर्धन व जतन करून भूगर्भात पाणी मुरवणे गरजेचे आहे. म्हणजे त्याचा उपयोग रब्बी हंगामासाठी होऊ शकेल. रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी, करडई तसेच कमी पाणी लागणारे हरभरा पिक घेता येईल. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. त्या ठिकाणी गहू पिकाच्या नवीन जातीचा विचार करावा. ऊस पिकाला शेतकऱ्यांनी खताच्या मात्रा तातडीने द्याव्यात. कारण उसाची वाढ समाधानकारक झालेली नाही, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी दिला आहे