तीन गावांना मिळणार नव्याने राशन दुकान परवाना
नेवासा तालुक्यातील 'ही' असतील गावे; अर्ज करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

स्वराज न्यूज नेटवर्क
तालुक्यात बंद पडलेली रेशन दुकाने नव्याने सुरू करण्यासाठी नवीन परवाने देण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे. यासाठी इच्छुकांकडून ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. नेवासा धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या माळेवाडी दुमाला, गोयगव्हाण व जळके खुर्द येथील दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला होता. ही दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी आता प्रशासनाने प्रकिया सुरू केली आहे. याकरिता असलेल्या विविध अटी व शर्तीसह जाहीरनामा जिल्हा धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्यांना रेशन दुकानाचा परवाना हवा आहे त्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार डॉ संजय बिरादार व पुरवठा निरीक्षण अधिकारी सुदर्शन दुर्योधन यांनी केले आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हयातील 14 तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राकरिता एकुण 164 गावातील व अहिल्यानगर जिल्हयातील तालुक्यामधील शहरातील एकुण 09 रास्तभाव दुकानाना परवाना मंजुर करण्याकरीता याव्दारे जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.
सदर जाहीरनाम्यातील सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील नमुना फॉर्म, इत्यादीबाबत माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगरचे अधिकृत संकेतस्थळावर www.ahmednagar.nic.in वर उपलब्ध आहे. तसेच संबंधीत तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेत वरील संपूर्ण तपशील व विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध होतील.
- अर्ज करु शकणारे गट किंवा संस्था –
1. पंचायत (ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था)
2. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट
3. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
4. संस्था नोंदणी अधिनियमाअंतर्गत, नोंदणी झालेल्या सर्व संस्था



