google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

होमगार्ड जवानांचे बंदोबस्त बिल थकले

उसनवारी करून जगण्याची वेळ; लोकसभा, विधानसभा निवडणूक बंदोबस्ताचे पैसे थकीत; सेवा नियमित नाही परंतु सणावाराला ’ऑन ड्युटी’

                                     स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून परिश्रमपूर्वक काम करणाऱ्या होमगार्ड दलातील जवानांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मानधन वेळेवर न मिळाल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. होमगार्ड हे पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे समान सेवा देतात. असे असतानाही त्यांना त्यांचे हक्क न देणे हा शासनाचा निष्काळजीपणा व अन्यायच म्हणावा लागेल. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांना अद्याप मानधन मिळालेले नाही.
          राज्याच्या गृहविभागाने गृहरक्षकांना मानधन देण्यास विलंब झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. परंतु, हा आदेश केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिला आहे. गणेशोत्सव, नवरात्री, रमजान, मोहरम, शिवजयंती, शालेय-महाविद्यालयीन परीक्षा, मोर्चा-निदर्शने आणि विविध निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्डचे जवान उपयुक्त ठरतात.
        होमगार्ड जवानांच्या मानधनात वाढ करून १ ऑक्टोबरपासून सुधारित भत्ते लागू करण्यात आले आहेत. होमगार्डना आता 1,083 रुपये ड्युटी भत्ता आणि 200 रुपये उपहार भत्ता मिळतो. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही सैनिकाला या वाढीव मानधनाचा अद्याप लाभ मिळालेला नाही. नेवासा होमगार्ड पथकात 143 होमगार्ड जवान कार्यरत आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 1909 होमगार्ड सेवा बजावत आहेत.
                होमगार्डच्या जवानांना वर्षातून ५२ ते ६० दिवस ड्युटीवर बोलावले जाते. त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून लक्ष दिले जात नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना मार्च 2019 मध्ये वर्षातील 180 दिवस होमगार्ड जवानांना ड्युटी देण्याचा शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर जुलै 2023 मध्येही मा. मंत्री महादेव जानकर यांनी होमगार्ड कल्याणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रश्नोत्तराच्या तासात फडणवीस यांनी गृहरक्षक दलाच्या जवानांना 180 दिवसांचे काम देण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. मात्र शासन निर्णयाची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनुनही होत नाही. दुसरीकडे, होमगार्डच्या जवानांना ३६५ दिवस काम द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र सरकार होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
कारवाईची तरतूद
 होमगार्ड जवानांना केलेल्या कर्तव्याचे मानधन देण्यास पंधरा दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. गृह विभागाचे तसे परिपत्रक केवळ कागदावरच दिसत आहे. कदाचित त्यामुळेच गेल्या वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत बंदोबस्तकामी गेलेल्या नगर जिल्ह्यातील होमगार्डला अद्याप मानधन मिळालेले नाही. जे जुन्या मानधनानुसार प्रतिदिन ६७० रुपये होते. निवडणुक होऊन नऊ महिने उलटले, तरी या बंदोबस्ताचे मानधन प्रलंबित आहे. सरकारच्या या उदासीन वृत्तीमुळे होमगार्ड्समध्ये असंतोष वाढत आहे.
बंदोबस्तावर नाही तर सेवा समाप्ती
निवडणुकी बंदोबस्तावर हजर न झालेल्या होमगार्ड जवानांची जिल्हा होमगार्ड कार्यालयाकडून सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे. परंतु अशीच तत्परता होमगार्ड जवानांच्या मानधन लवकर मिळण्याबाबत दाखवावी, अशी भावना होमगार्ड जवान खाजगीत बोलून दाखवत आहेत.
नगर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे अद्याप मानधन मिळालेले नाही. खासदारांना निवडून आल्यानंतर आठ महिन्याचे मानधन मिळालेले आहे परंतु होमगार्ड जवानांना त्यांच्या हक्काच्या मानधनाची अजूनही प्रतीक्षाच आहे. दत्तात्रय बनसोडे, होमगार्ड नेवासा पथक.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!