
स्वराज न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेर महाविद्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या प्रगत पत्रकारिता अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये भगवान अहिरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून ॲड. राजू खरे यांनी द्वितीय, तर अफसर शेख यांनी तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशामागे पत्रकारिता विभागाचे मार्गदर्शक डॉ. संतोष खेडलेकर यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील विविध पैलू, प्रभावी लेखन कौशल्य, सामाजिक भान तसेच व्यावहारिक ज्ञान याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांनी गुणवत्तापूर्ण यश संपादन केले.

प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन व सहकार्य देत अभ्यासक्रम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारितेमार्फत होत असते. आमच्या महाविद्यालयातून सक्षम आणि जबाबदार पत्रकार घडत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचा प्रभावी समाज घडवणारे ठरतील,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही हे विद्यार्थी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास केंद्रीय पत्रकार संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मोहन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.



