google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्री 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभागी

                              स्वराज न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले.

            ठाणे येथील किसननगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 23 मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थी आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी आभारही मानले.

          पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

           ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. प्रधानमंत्र्यांच्या संवादानंतर त्यांनी शाळा क्रमांक 23 च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

        मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, देशालाच एक कुटुंब मानून, त्याच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्यापातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थांना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. त्यांचे विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परीक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपले आयुष्य घडवतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

             ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी सुमारे 150 देशांतील विद्यार्थ्यांनी, 51 देशातील शिक्षकांनी आणि 50 देशातील पालकांनी नोंदणी केली आहे. देशातील सुमारे 38 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक आज या ‘परिक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

           शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नाही, असे सांगितले.

‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत

प्रधानमंत्र्यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत

शाळा क्रमांक 23 विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.

           कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!