चार तरुण भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू
नेवासा तालुक्यातील घटना; एकाला वाचवतांना चौघे बुडाले
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम कायगाव येथून पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी देवदर्शनासाठी जात असलेल्या वैजापूर तालुक्यातील चार तरुण भाविकांचा गोदावरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.11) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
नेवासा तालुक्यातील टोका येथील सिद्धेश्वर मंदिर घाट येथे ही दुर्दैवी घटना घडली. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथून निघालेले नऊ तरुण भाविक प्रवरासंगम येथे स्नान करून मढी येथे जाणार होते. दुपारी 3:30 वाजता ते मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर मंदिर येथे घाटावरून पाण्यात उतरले. यावेळी एक जण पाण्यात बुडत असल्याचे पाहताच इतर मित्रही त्याला वाचवण्यासाठी धावले. परंतु दुर्दैवाने चार जण बुडाले. पाण्यात उतरलेल्या पाच जणांपैकी एक जण सुखरूप पाण्याबाहेर आला.
पाण्यात मयत झालेल्यामध्ये बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), आकाश भागिनाथ गोरे (वय 20) व शंकर पारसनाथ घोडके (वय 22) या चौघांचा समावेश आहे. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह प्रथम बाहेर काढण्यात यश आले.
गोदावरी नदीतील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार लोकांना ताबडतोब मदतीसाठी बोलवण्यात आले. पोलिसांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आपातकालीन मदत करणाऱ्या पथकालाही पाचारण करण्यात आले. सुमारे दोन तासानंतर पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले त्यानंतर अर्धा अर्धा तासाच्या अंतराने अजून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्र होत असताना अंधार पडत असतानाही मदत कार्य चालूच होते.
या ठिकाणी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज भोंगे, पोलीस नाईक अशोक कुदळे, गोपनीय शाखेचे राहुल केदार, माने, वैद्य हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.