google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर!

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा; अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

                                  स्वराज न्यूज नेटवर्क

अहमदनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झाल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

            जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

               मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचं भाग्य आहे. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आम्हाला भाग्य मिळाले. ज्यांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना 20 दिवसात सत्तेतून घालवून टाकण्याचे काम आम्ही केलं.

           मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आपले राज्य असून या भूमीचा वसा आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्याकाळात जमीन, महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवींनी न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली
               उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. आपला आत्मभिमान, आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करून हिंदवी स्वराज वाढवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली. त्यांनी राज्यात पायभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले. देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी स्व पैशातून केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

        व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिवराव लोखंडे, खा. सुजय विखे पाटील, आ. प्रा.राम शिंदे, आ. मोनिकताई राजळे, आ. बबनराव पाचपुते, आ. गोपीचंद पडळकर, अण्णासाहेब डांगे, आ. सुरेश धस, मा. खा. विकास महात्मे, मा. आ. भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.

              अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली. नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला 533 वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे.

           अहमदनगरचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून करण्याची मागणी केली जात होती. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी या आधी ही मागणी केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!