आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
नेवाशात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा
आयुक्तांनी काढलेल्या पत्राची तहसीलसमोर होळी; 3 जानेवारी रोजी हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील तहसील कार्यालयावर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका – मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, वेतनवाढ, दरमहा पेन्शन, लाभार्थीच्या आहाराचा दर दुप्पट करा आदींसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला.
नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून मोर्चाची सुरवात होऊन पेठेतुन विविध घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. यावेळी निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रॅज्युटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा मिळावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून योगदान न घेता दरमहा पेन्शन द्यावी यासह विविध मागण्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके म्हणाले, अंगणवाडी सेविकांनी 48 वर्षापासून प्रकल्प चालू ठेवलेला आहे. अंगणवाडी सेविकांना केवळ दहा हजार रुपये मासिक मानधन तर मदतनिसांना केवळ साडेपाच हजार रुपयांमध्ये घर चालवावे लागते. मिळणारे मानधन हे अत्यल्प असून राजकीय नेत्यांनी या मानधनात आपले घर चालवून दाखवावे, असे त्यांनी आवाहन केले. अंगणवाडी सेविका केवळ मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणच नाही तर राजकीय नेत्यांच्या सभेला गर्दी जमवण्याचे कामही त्यांना करावे लागते. अंगणवाडी सेविकांनी कोविड काळातही प्रभावी काम केलेले आहे परंतु अशा कामाचे शासनाकडून कमी मानधन देऊन त्याचे अवमूल्यन केले जात आहे.
सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे म्हणाले की अंगणवाडीला देण्यात येणारा निधी हा सरकारद्वारे बालकांच्या शिक्षणावर भविष्यासाठी होणारी गुंतवणूक आहे. त्यामुळे शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युइटी मिळाली पाहिजे. शासनाचे धोरण श्रमिकांच्या, कामगारांच्या विरोधात आहे. सरकारला या वर्गाची काळजी नाही. अध्यक्ष कॉ. मदिना शेख म्हणाल्या की सरकारने पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी देण्यात येणारा निधी घटवला आहे. सरकार आतापर्यंत केवळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1000 ते 500 रुपयांचीच लाजिरवाणी वाढ देते. आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ’मन की बात’ ऐकण्याची वेळ आली आहे. अंगणवाडी सेविका सिंधू माळी यांनी आपल्या भाषणात अंगणवाडी सेविकांच्या व्यथा चारोळ्यांमध्ये गाऊन शासनाचा धिक्कार केला. यावेळी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी हे 4 डिसेंबरपासून संपावर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने करीत आहेत. हिवाळी अधिवेशनात नागपुर येथे अंगणवाडी कृति समितीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढूनही शासनाने काही दखल घेतली नाही. म्हणून 3 जानेवारीपासून मुबंई येथे हजारो अंगणवाडी कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहिर करण्यात आले. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी केंद्र ताब्यात घेणेबाबत काढलेले पत्र जाळून होळी करण्यात आली.
आंदोलनात यावेळी कॉ. राजेंद्र बावके, कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरूडे, मायाताई जाजू, अलका दरंदले, विमल वांढेकर, नंदा राजगुरू, सुनिता घालमिले, मंदा निकम, बेबी आदमणे, चंद्रकला विटेकर, नंदा उगले, हिराबाई देशमुख, सुवर्णा गायकवाड, सुरेखा खरचंद, मंगल रोडे, कावेरी शिंदे, सुनीता पवार, अलका पंडित, पुष्पा कापसे, मनीषा कांगुणे, सुषमा सोनवणे, शांता साळवे, अलका तांदळे, छाया बानकर, सुरेखा बाचकर, सुजाता कर्जुले, मंगल मिसाळ, शहनाज सय्यद, बेबी गाढे, वैशाली गोंनटे आदींसह मोठया संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
नेवासा तहसील आवारात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची झलक
⇓♦ Click here ⇓♦⇓♦