google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

नेवासा येथे ख्रिस्ती समाजाचा मूक मोर्चा

चर्चवरील हल्ले थांबवा, धर्मगुरुंवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी; नेवासा तहसील कार्यालयावर मूक मोर्चाची धडक

                             स्वराज न्यूज़ नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुका सकल ख्रिस्ती बांधवांच्यावतीने गुरुवार (दि. 2) रोजी सकाळी 11 वाजता नेवासा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरू व चर्चवरील भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव व भगिनी व युवकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. 
          ख्रिस्त राजा चर्च घोडेगांवचे प्रमुख धर्मगुरु फादर सतीश कदम व नेवासा येथील कॅथोलिक आश्रम ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरु जॉन गुलदेवकर, नेवासा तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष प्रकाश चक्रनारायण, उपाध्यक्ष पास्टर किशोर बोर्गे व तालुक्यातील सेवक व पाळक यांनी यावेळी शिस्तबद्ध मूक मोर्चा काढला होता. नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणातून हा मूक मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरुन तहसील कार्यालयाकडे वळविण्यात आला.  यावेळी मोर्चेकरी ख्रिस्ती बांधवांनी निषेधाचे फलक मोर्चात झळकाविले.
  
           यावेळी ख्रिस्त राजा चर्च घोडेगांवचे धर्मगुरु सतीश कदम म्हणाले की, भारतीय ख्रिश्चन असल्याचा अभिमान आहे. चर्च व धर्मगुरूंवरील हल्ले त्वरित थांबवा, हल्लेखोरांचा त्वरित बंदोबस्त करा, धर्माच्या शिकवणीनुसार भक्तीचा आमचा हक्क आहे, असे सांगून ख्रिस्ती धर्मियांवरील होणाऱ्या भ्याड हल्ल्याचा फादर कदम यांनी तीव्र शब्दांत निषेद्घ व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी न करता फलकांद्वारेच आपल्या भावना व्यक्त केल्या. हातावर आणि खिशावर काळ्या फिती लागून समाजातील अपप्रवृतीचा यावेळी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 
          नेवासा तहसील कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेत धर्मगुरूंवर खोटे आरोप व गुन्हे दाखल केले जात आहेत. धर्मांतराचा आरोप केला जात आहे. संविधानानुसार जगण्याचा हक्क हिरावला जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ख्रिश्चनांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप मोर्चाकऱ्यांच्यावतीने यावेळी करण्यात आला. ख्रिस्ती धर्म व धर्मगुरु समाजाला सदवर्तनाची शिकवण देत असताना काही धर्मांध शक्तींकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने हा त्यांचा गुन्हा आहे काय? असा उद्विग्न सवाल पास्टर प्रकाश चक्रनारायण यांनी उपस्थित केला. ख्रिस्ती धर्मगुरुंवरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व नुकसान केलेल्या चर्चना नुकसान भरपाई मिळावी अशी एकमुखी मागणीही यावेळी ख्रिस्ती बांधवांनी मोर्चात करण्यात आली. देशात विविध जाती-धर्माचे लोक त्यांच्या संविधानिक अधिकारानुसार गुण्या गोविंदाने राहत असतांना ख्रिस्ती समाज, धर्मगुरु तसेच प्रार्थनास्थळांना लक्ष्य करुन जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या घटनांकडे यावेळी लक्ष्य वेधण्यात आले.
           धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करा व ख्रिस्ती धर्माच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या वधस्तंभाचा अवमान केला जात आहे. धर्मस्थळे पाडण्याची वक्तव्ये सुरू आहेत. ख्रिस्ती विधी, प्रभू भोजन विधीसंदर्भात संभ्रम निर्माण केला जात असल्याचे यावेळी ख्रिस्ती बांधवांनी निषेध सभेत आपले मनोगत व्यक्त करतांना विविध पाळक व धर्मगुरुंनी यावेळी केला.  नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी निवेदन स्विकारुन आपल्या भावना शासनस्तरावर पाठविल्या जातील असे आश्वासन यावेळी मोर्चाकऱ्यांना दिले.
 
            या मोर्चात रेव्हरंट जगदीश चक्रनारायण, रेव्हरंट अनिल वंजारे, रेव्हरंट विजय गोरे, पास्टर हरिश चक्रनारायण, शमुवेल भिंगारदिवे, संजय पाटोळे, मार्कस बोर्डे, राष्ट्रीय ख्रिस्ती सेनेचे डॉ. प्रविणराजे शिंदे, रंजन जाधव, सुभाष चक्रनारायण, जनाभाऊ मिरपगार, किशोर लोंढे, राजेंद्र वाघमारे, पप्पू इंगळे, रविंद्र पवार, मनोज ससाणे, प्रकाश शिंदे, शेखर वाघमारे, मुन्ना चक्रनारायण, राजू साळवे, विश्वास चक्रनारायण, बालूभाऊ आल्हाट व मोठ्या संख्येने सेवक व धर्मगुरु यावेळी मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीताने आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!