महाराष्ट्र
‘संजय गांधी’ व ‘श्रावणबाळ’साठी पाच वर्षातून एकदाच द्यावा लागणार उत्पन्न दाखला
शासन निर्णय जारी; सामान्यांना दिलासा
स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : विशेष सहाय्य योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे. सदर योजनेतील 50 वर्षावरील लाभार्थ्याच्या अडी अडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील 50 वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यासाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो 5 वर्षातून एकदा घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०६२२१२४६३०४९२२ असा आहे.

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवा योजनेत निराधार महिला, अनाथ मुले, दिव्यांग यात सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कुष्ठरोग, स्वत:चा चरितार्थ चालू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोटित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेली महिला, तृतीयपंथी, 35 वर्ष पूर्ण झालेली अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेलग्रस्त या लाभार्थ्यांचा समावेश होतो.