ब्रेकिंग
सेंट मेरीज स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
देशाचे नाव जगभर उज्ज्वल करण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे; डॉ अशोकराव ढगे यांचे प्रतिपादन

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील अहिल्यानगर येथील सेंट मेरीज स्कूलमध्ये देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे उपस्थित होते.

डॉ. ढगे म्हणाले की, देशाचा इतिहास योगदान व बलिदानाचा आहे. देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक देशभक्तांनी कारावास भोगला. फासावर चढले. आंदोलने केली. अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करणे आपले कर्तव्य आहे. तसेच भारताने स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात क्रांतिकारक प्रगती केली आहे. कृषी क्रांती, औद्योगिक उन्नती, अवकाशातील संशोधन, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रगती उल्लेखनीय झालेली आहे. विशेषतः शास्त्रज्ञांनी संशोधनात भरीव प्रगती केली आहे. शेतकऱ्यांनी अपार कष्ट घेतले. त्याचबरोबर सैनिकांनी देशाच्या रक्षणाची जबाबदारी बलिदान देऊन पार पाडली. विविध नेत्यांनी अभ्यासपूर्वक देशाला योग्य दिशा दिली.

आजचा काळ अत्यंत गतिमान झाला आहे. संपूर्ण जग एक प्रकारे कुटुंब झाल्यामुळे दूरदर्शीपणा व विधायक दृष्टी नेत्यांकडे असणे काळाची गरज आहे. आजचे प्रश्न म्हणजे भरमसाठ वाढणारी लोकसंख्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पुढाऱ्यांचा भ्रष्टाचार, महिलांचे प्रश्न व बेरोजगारी यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. युवकांनी विविध क्षेत्रात परिश्रम घेऊन देशाचे नाव जगामध्ये उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन डॉ. ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सि. जोसी होत्या.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात झेंडावंदन पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी प्रणव शिंदे व सोनाक्षी सोनवणे यांनी भाषणे देशभक्तीपर नृत्यामध्ये प्रणाली बोरुडे, प्रज्वल शहाराव हे विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन विराज काकडे तर अक्षदा सुकाळकर हिने आभार प्रदर्शन केले.
तदनंतर विविध खेळांचे अंतिम सामने झाले. यावेळी रस्सीखेच, रिले, 100 मीटर, 200 मीटर धावणे, सायकल रेस, बटरफ्लाय रेस, लिंबू चमचा, पिरॅमिड रेस या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विजयी संघ, वैयक्तिक विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. अत्यंत आनंदी व प्रसन्न वातावरणात गणतंत्र दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.