राजकिय
सहकार क्षेत्र लुटण्यासाठीच केंद्रात सहकार खाते
साखर, गुळाला चिटकलेला शहा नावाचा मुंगळा उपटून काढा; उद्धव ठाकरे यांचा नेवाशात घणाघात

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : महाराष्ट्राचे वैभव संपन्न सहकार क्षेत्र लुटण्यासाठी केंद्रामध्ये सहकार खाते निर्माण करण्यात आले. आता सहकाराच्या साखरेला आणि गुळाला चिटकलेला शहा नावाचा मुंगळा उपटून काढावा लागेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केले.
नेवासा विधानसभा मतदारसंघाचे विकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी गडाखांच्या एकनिष्ठेबद्दल कौतुक केले व राज्य शासनापेक्षा केंद्र शासन आणि मोदी, शहा यांच्यावर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी माझ्या बॅगा तपासल्या जातात. त्यात पैसे आहेत का हे पाहिले जाते. पण मोदींच्या बागा तपासल्या जात नाहीत कारण त्यात फक्त भरभरून आश्वासनाच्या थापा आणलेल्या असतात. या थापांना महाराष्ट्र भुलणार नाही.
आमचे पक्ष व चिन्ह चोरले तरी धनशक्ती विरोधात आमच्याकडे जनशक्ती आहे, असे स्पष्ट करताना मोदी आणि शहा यांना शिवसेना संपल्याशिवाय महाराष्ट्र लूटता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर सरकार पाडले. तसेच केंद्रात प्रथमच सहकार खाते निर्माण करून शहा यांनी सहकार खाते गिळंकृत करण्यासाठी स्वतःकडे ठेवले. सहकाराच्या साखर आणि गुळाच्या ढेपीला लागलेला शहा नावाचा मुंगळा उपटुनच काढावा लागेल.
महाराष्ट्रामध्ये ठाकरे, गडाख ही घराणेशाहीची उदाहरणे नसून आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे. आम्ही खोके मोजणारे नसून मर्दानी डोके मोजणारे आहोत असे सांगताना शंकरराव गडाख यांच्या एकनिष्ठेचे कौतुक करून आघाडीचे सरकार आले तर त्यांना महत्त्वाचे खाते देऊन मंत्री करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुलांना मोफत शिक्षण, महिलांना तीन हजार रुपये, निवृत्त कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीचे निवृत्तीवेतन देण्यात येईल अशी आश्वासने ठाकरे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाणारे हे आपल्या संस्कारांना व अस्तित्वाला पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेचे आशीर्वाद व जनशक्तीच्या आधारे मी महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करून देईल असे ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात, उमेदवार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, युवा नेते उदयन गडाख, अशोक गायकवाड, लताताई गांगे यांची भाषणे झाली
तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत हे जनतेचे स्वप्नतुम्हाला चाळीस गद्दारांनी धोका दिला. आम्हाला दोन गद्दारांनी धोका दिला. महायुतीच्या अडीच वर्षांमध्ये शंकरराव गडाख आणि नेवासा तालुक्याला भाजपने खूप त्रास दिला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत असे आमचे आशीर्वाद व जनतेचे स्वप्न आहे. –ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख