ब्रेकिंग
वीज कोसळून शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू
नेवासा तालुक्यातील घटना; गेल्या दोन दिवसात तिसरा वीजबळी; विजेच्या कडकडाटासह पावसाचा कहर
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना नेवासा तालुक्यातील म्हसले येथे शुक्रवार (दि. 28) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. साई उर्फ बहिरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय 10 वर्षे ) असे मयत शाळकरी मुलाचे नाव आहे.
नेवासा तालुक्यात आज सकाळी विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. पाऊस सुरु होताच सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घरच्यांसोबत शेतातील काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी गेलेल्या साई उर्फ बहिरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय 10 वर्षे ) या इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या शालेय विद्यार्थ्याच्या अंगावर कडकडणारी वीज पडली, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.
दरम्यान, नेवासा तालुक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये साई शिरसाठ हा विद्यार्थी तिसरा वीजबळी ठरला आहे. बुधवार (दि. 26) रोजी तालुक्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी वीज पडण्याची घटना घडली होती. त्यात देडगाव येथील शेतमजूर महिला सविता राजू बर्फे (वय 42 वर्षे) व अंमळनेर येथील शेतकरी रावसाहेब भागाजी बोरूडे (वय 54 वर्षे) हे शेतामध्ये काम करीत असताना अंगावर वीज पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. याच दिवशी देडगाव येथील तांबे वस्तीवर वीज पडल्याने एका गाईचाही मृत्यू झाला होता. वीज पडण्याच्या या दुर्देवी घटनेनंतर संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.