google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

गायरान जागेवरील घरकुले नियमित करण्यात येतील

महसूलमंत्र्यांची घोषणा; निळवंडे कालवा शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार; राहाता तालुक्यातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचे पुणतांबा येथे लोकार्पण

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
शिर्डी : येत्या काळात वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूक करिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे‌. यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल. गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या.
                  राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पहिल्या शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोर मोरे, राहाता गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कोपरगाव गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,  पुणतांबाचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे, भाजप पदाधिकारी नितीन दिनकर, राजेंद्र बापू जाधव, सुभाष वहाडणे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
             निळवंडेच्या डाव्या कालव्यातून 31 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात येणार आहे‌. अशी माहिती देऊन महसूलमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, निळवंडे च्या पाण्यामुळे दुष्काळी भागाला सोन्याचे दिवस येणार आहेत. उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी ही ऐतिहासिक घटना ठरणार आहे. 
               वाळू धोरणावर महसूलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात सध्या सहा डेपो सुरू झाले आहेत‌. येत्या काळात राज्यात 600 डेपो सुरू करण्याचे धोरण आहे. गरिबांना 600 रूपये ब्रास एवढ्या माफक दरात वाळू देण्याचा राज्य शासनाचा‌ हा कल्याणकारी निर्णय आहे. नागरिकांनी दलालांकडून वाळू खरेदी करू नये. शासनाच्या उपक्रमास सहकार्य करावे. असे आवाहन महसूलमंत्र्यांनी यावेळी केले.
                महसूल, पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांनी‌‌ वाळू दलालांना पाठीशी घालू नये. अन्यथा अशा लोकांवर कारवाई केली जाईल. अशा इशाराही महसूलमंत्री विखे- पाटील यांनी यावेळी दिला.
             पुणतांबा सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी यावेळी भाषण केले. प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले. यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील पंतप्रधान, शबरी व रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास वाळू मोफत देण्यात आली. पुणतांबा येथील कृषी यांत्रिकीकरण अभियानातील लाभार्थी मनिषा धनवटे, सुमित घोडेकर, गणपत बोरभणे, शोभा धनवटे व संदीप धनवटे या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!