आरोग्य व शिक्षण
आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त करुन घ्यावे
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रशासनाचे आवाहन
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत असुन या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त करुन घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रशासनाचे आवाहन
या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात 44 अंगीकृत रुग्णालये असुन 1 हजार 209 प्रकारच्या विविध आजारावर मोफत उपचार केले. जातात. या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.
या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याना दिला जातो. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 11 लक्ष 955 लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी या लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. आतापर्यंत 3 लक्ष 15 हजार लाभार्थ्यांनीच आयुष्मान कार्ड काढून घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील फक्त 29 टक्के लाभार्थ्यांनीच आयुष्मान कार्ड काढून घेतले आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची यादी www.pmjay.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढुन घेण्यासाठी ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र येथील केंद्र चालक तसेच खासगी आपले सरकार सेवा केंद्र (common service center ) येथील केंद्र चालक तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यामित्रांशी रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन संपर्क साधणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासन आपल्या दारी मोहिमेंतर्गत सर्व तालुक्यामध्ये शिबिरांचे आयोजन केलेले आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड लवकरात लवकर काढुन घ्यावे. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथील योजनेच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.