राजकिय
आ. शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विराट जनसमुदायाच्या साक्षीने अर्ज दाखल, तालुक्याच्या विकासासाठी 'मशाल' घराघरात पोहचवा. आ. गडाखांचे आवाहन

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा येथे शक्तिप्रदर्शन करत आ. शंकरराव गडाख यांनी खा. भाऊसाहेब वाकचौरे, रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. “गडाख साहेब तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा यावेळी गडाख समर्थकांनी दिल्या. अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या मेळाव्यात गडाख यांनी नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहचवा, असे आवाहन केले.
नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्याच्या प्रसंगी जेष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख, युवा नेते उदयनदादा गडाख, प्रविण गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास आघाडीच्या उबाठा शिवसेनेचे उमेदवार आ. शंकरराव गडाख, अशोकराव गायकवाड, जेष्ठ नेते विश्वासराव गडाख, राष्ट्रवादीचे मा. आ. पांडुरंग अभंग, भैय्यासाहेब देशमुख, मच्छिंद्र हापसे, अँड.एम.आय.पठाण, मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार, रावसाहेब कांगुणे, लक्ष्मण जगताप, संजय सुखदान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या मेळाव्यात आ. शंकरराव गडाख म्हणाले की मागच्या निवडणूकीत मला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर उध्दवजी ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत प्रवेश देऊन मंत्री केले. अडीच वर्षाच्या मंत्री पदाच्या काळात मी मंत्री पदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. उध्दव साहेबांचा स्वभाव मला आवडला म्हणून त्यांना साथ देण्याचा निर्णय मी घेतला. सत्ताबदल झाल्यानंतर विकास कामासाठी मंजूर झालेला निधी मला मिळू दिला नाही. अनेक मंजूर निधींना स्थगिती देण्याचे काम झाले. पालकमंत्री यांनी देखील निधी वाटपात नेवासा तालुक्यावर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला. अजून दोन वर्षे मंत्रिपद राहिले असते तर वीज, पाणी, रस्त्याचे प्रश्न सुटले असते, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
महाविकास आघाडीला जसे लोकसभेला यश मिळाले, त्याच प्रमाणे यश या निवडणुकीत मिळणार असून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आ. गडाख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. आरोप करून हिडीस राजकारण करण्याचा विरोधकांचा डाव वेळीच ओळखा. विजयश्री प्राप्त करण्यासाठी आपआपसातील मतभेद मिटवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी बोलतांना जेष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले की मागच्या निवडणुकीत शंकरराव एकटे होते. या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उबाठा शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि राहुल गांधी यांची काँग्रेस यांची शक्ती पाठिशी आहे. खूणगाठ बांधून शंकरराव गडाख यांना विधानसभेच्या या निवडणूकीत प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यानंतर शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या उपस्थितीत रॅलीस प्रारंभ झाला. सदरची रॅली तहसीलदार कचेरीकडे निघाल्यानंतर “गडाख साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा यावेळी समर्थकांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी आ. गडाख यांच्या समर्थकांनी गळ्यात मशाल चिन्ह असलेल्या भगव्या पट्ट्या गळ्यात घातल्या होत्या. तहसील कचेरीकडे जाणारा श्रीरामपूर रस्ता गर्दीने व्यापला होता.
नेवासा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांच्याकडे आमदार शंकरराव गडाख यांनी आपला उमेदवारी अर्ज सुपूर्त केला. अर्ज देतेवेळी उबाठा शिवसेनेचे खा. भाऊसाहेब वाकचौरे, रावसाहेब खेवरे उपस्थित होते.