
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) यांना रास्तभाव धान्य दुकानांतून अन्नधान्य पुरवठा केला जातो. परंतु, सरकारने आता या लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांना अन्नधान्य मिळणार नाही. मार्चअखेर नेवासा तालुक्यातील 67.80 टक्के रेशनकार्डधारकांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे. सर्वच लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन नेवासा पुरवठा विभागाने केले आहे.
सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मग आधार असो, बँकचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
नेवासा तालुक्यामध्ये एकूण 151 स्वस्त धान्य दुकाने असून त्या मार्फत धान्य वितरण केले जाते. नेवासा तालुक्यामध्ये प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थी एक लाख 90 हजार एवढी संख्या आहे. तालुक्यासाठी इस्टांक प्राप्त होऊन तो पूर्ण झालेला आहे.
तालुक्यामध्ये एकूण 7 हजार 163 अंत्योदय रेशन कार्डचा इष्टांक उपलब्ध आहे. त्यापैकी 7 हजार 50 अंत्योदय रेशन कार्डधारक दरमहा 35 किलो धान्याचा लाभ घेत आहेत. यामध्ये अजून 113 अंत्योदय रेशन कार्डधारक जोडले जाऊ शकतात. यात अपंग, दुर्धर आजाराने पीडित, परितक्त्या, विधवा यांना 35 किलो मोफत अन्नधान्याचा लाभ दिला जातो.
ई-केवायसी न केल्यास कार्ड होईल बंद
ई-केवायसी न केल्यास तुम्हाता रेशन मिळणार नाही. तसेच रेशनकार्डामधून तुमची नावे काढून टाकली जावू शकतात. यासाठी लाभार्थी घरी बसून ‘मेरा राशन’ या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने केवायसी करू शकतात.

ज्यांच्याकडे ई-श्रम कार्ड आहे परंतु रेशन कार्ड नाही अशा नागरिकांनी ई-श्रम कार्ड घेऊन नेवासा तहसील येथील पुरवठा शाखेचे संपर्क साधावा. त्यांना रेशन कार्ड दिले जाईल. -सुदर्शन दुर्योधन, पुरवठा निरीक्षण अधिकारी नेवासा.