ब्रेकिंग
पाकिस्तानविरुद्ध युध्द पुकारा
आम आदमी पार्टी, नेवासा कार्यकर्त्यांचे पंतप्रधानांस पत्र; तहसीलदार यांच्यावतीने दिले पत्र

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाकिस्तानविरुध्द युध्द पुकारण्याची मागणी केली आहे. सदरचे पत्र कार्यकत्यांनी तहसीलदार, नेवासा यांचेमार्फत पाठविले आहे.
तहसीलदार डॉ संजय बिरादार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दि. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत निंदनीय असून अशाप्रकारे नेहमी पाकिस्तानकडून भारतातील एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचे काम केले जात आहे. नेहमीच पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवायांना समर्थन देऊन निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत वेळोवेळी झालेल्या ठरावांची अवहेलना करुन पाकिस्तानने नेहमी भारतातील दहशतवादाला खत-पाणी घातलेले आहे. हे संपूर्ण जगाला माहित आहे.
याला सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला घेतला पाहिजे. आता कुठल्याही परिस्थितीत गप्प न राहता पाकिस्तानबरोबरचे सर्व व्यापारी व इतर संबंध कायमस्वरुपी तोडून त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारले पाहिजे, अशी तमाम भारतीय जनतेची भावना आहे. घटनेला जवळजवळ आठवडा उलटत आला असून आता उशीर न करता पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे की जेणेकरून पुन्हा भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचर हिम्मत होणार नाही. पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याची मागणी केवळ आमचीच नसून संपूर्ण भारतीयांची ही मनोमनी इच्छा असून संपूर्ण भारतीय आपल्या पाठीशी तन-मन-धनाने उभे राहतील.
सदर जनतेच्या भावनाबाबतच्या पत्रावर तालुकाध्यक्ष अॅड. सादिक शिलेदार, शहराध्यक्ष संदिप आलवणे, सलिमभाई सय्यद, मुन्ना आतार, विठ्ठल मॅदाड, करिमभाई सय्यद, प्रविण तिरोडकर, कुणाल मांडण, भैरवनाथ भारसकर, देवराम सरोदे, किरण भालेराव, सुखदेव भुमकर, अण्णासाहेब लोंढे, बाळासाहेब साळवे, राजु महानोर, सुमित पटारे, शेखर म्हस्के, बापुसाहेब आढागळे, संजय काळोखे आदिंच्या सह्या आहेत.