
- स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळी प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे (वय २९, रा. वडुले), आकाश उर्फ दत्तु उर्फ दत्ता उर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत (वय २५, रा. चिलेखनवाडी) आणि योगेश मच्छिंद्र सावंत (वय २८) यांनी एकत्रितपणे गुन्हेगारी टोळी तयार करून नेवासा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या टोळीने गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ व दमदाटी, दरोडा टाकणे, अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, गुंगीकारक पदार्थांची विक्री करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ९ गुन्हे केल्याची नोंद आहे.
सन २०२० ते सन २०२५ या कालावधीत टोळीने सातत्याने गुन्हे करत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. याआधीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती; मात्र त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. परिणामी, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि कोणीही उघडपणे तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.
या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर गुन्हे टाळण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत संबंधित आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी चौकशी करून शिफारस केली होती.
सदर प्रस्तावावर सखोल विचार करून संबंधित तिघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून ३ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्राधिकरणाकडून पारित करण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा टोळ्यांची माहिती संकलित करून हद्दपारीसारख्या कठोर कारवाया सुरू आहेत. शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध, हत्यार कायदा तसेच वाळू चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवरही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



