google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

नेवासा नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात नेवासकरांचा मोर्चा

अनियमित व अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठयाच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाबरोबर दूषित पाण्याच्या बाटल्या

                                  स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अनियमित व अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठयाच्या निषेधार्थ शुक्रवार (दि. 21) रोजी नेवासा नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात नेवासकरांच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर वरील प्रश्नांच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चामध्ये नागरिकांनी नगरपंचायतच्या कारभाराचे वाभाडे काढले. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाबरोबर दूषित पाण्याच्या बाटल्याही दिल्या. नेवासकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमितपणे करावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन नेवासा नगरपंचायतच्या विरोधात छेडल्या जाईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष व नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी यावेळी दिला.
    
         नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणापासून मोर्चास सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. या मोर्चामध्ये सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आला. यावेळी नेवासकर नागरिकांच्या वतीने शांताराम गायके यांनी नगरपंचायतने दुर्लक्ष केल्यामुळे अनियमित पाणीपुरवठा आज नेवासकरांना होत असून दुर्गंधीयुक्त पाणी पिल्यामुळे नेवासकरांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
           
           यावेळी बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखदान, गफूरभाई बागवान, अँड.काकासाहेब गायके, अँड. बन्सीभाऊ सातपूते, प्रविण सरोदे यांनी आपल्या मनोगतातून नगरपंचायत प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. तर माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आमदार शंकरराव गडाख यांनी मंत्री असतांना पाणी योजनेसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करून आणला होता मात्र सत्ताधारी शासनकर्त्यांनी तो निधी मिळू दिला नाही त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे सांगितले.
    
         या मोर्चा प्रसंगी माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, असिफ पठाण, राजेंद्र मापारी, रणजित सोनवणे, पोपटराव जिरे, इम्रान दारुवाले, संतोष राजगिरे, जितेंद्र कु-हे, सचिन नागपुरे, संदीप बेहळे, वंचितचे तालुकाध्यक्ष हरिश चक्रनारायण, अक्षय खाटीक, राहुल देहाडराय, दत्तात्रय गडाख, महंमदभाई टेलर, पिंटू परदेशी यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी नेवासकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   
              यावेळी नगरपंचायत  प्रशासक असलेले तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीनेवासा शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रवरासंगम येथे जॅकवेल घेऊन पाईपलाईनद्वारा योजना राबविण्यात आली आहे. पण ही योजना अत्यंत जुनाट झाली असुन तिच्या मशिनरीमध्ये तसेच पाणी शुध्दीकरण युनिटमध्ये वारंवार दुरुस्त्या करुनही उपयोग होत नाही. पाईपलाईन जीर्ण झाल्याने तिचे लिकेजेस वाढले आहेत. पाणी शुध्दीकरण युनिट चालू नसल्याने योजनेतून नागरीकांना अशुध्द, अस्वच्छ व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो अशा महत्वाच्या समस्या दिलेल्या निवेदनात स्पष्ट केल्या आहेत.
   
         नगरपंचायतचे प्रशासक म्हणून काम पहात असलेले तहसीलदार डॉ. संजय बिरादार हे गैरहजर असल्याने त्यांच्याऐवजी निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व नगर पंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना निवेदन देण्यात आले. याबाबत मोर्चेकऱ्यांना कारवाई बाबत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. यावेळी  निवेदनाबरोबर मुख्याधिकाऱ्यांना दूषित पाण्याच्या बाटल्या भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी नेवासकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर बसपाचे शहराध्यक्ष विकास चव्हाण यांनी मोर्चेकरांचे आभार मानले.
    
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!