धुराळा ग्रामपंचायतीचा : उमेदवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा
उमेदवारी अर्ज भरताना होत होती इच्छुकांची दमछाक; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा
स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वर डाऊन होत असल्याने उमेदवारांची मोठी दमछाक होत होती. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध असलेली वेबसाईट सातत्याने बंद पडत असल्याने इच्छुकांची मोठी अडचण झाली होती. सरपंच पदाचा एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किमान दीड तासांचा वेळ लागत होता. सातत्याने येत असलेल्या अडथळ्यामुळे अर्ज दाखल दाखल होतील की नाही अशी धाकधूक इच्छुकांना लागली होती. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाइन उमेदवारी अर्ज सादर करण्यास परवानगी दिली आहे.
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
आयुक्त मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.