नोकरीमहाराष्ट्र
TET : तब्बल 96 टक्के शिक्षक नापास
'शिक्षक पात्रतेचा' निकाल घसरला; 13 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अंतिम निकाल घोषित; 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती परीक्षा
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक असते. लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. परंतु या वर्षाच्या टीईटी परीक्षेचा धक्कादायक निकाल लागलेला असून तब्बल 96 टक्के शिक्षक या परीक्षेत नापास झालेले आहेत. यावर्षी टीईटीचा निकाल घसरलेला आहे. शिक्षक पदासाठी केवळ साडेतीन टक्के विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज जाहीर केलेल्या निकालासंबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात टीईटीचा अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्राथमिक व माध्यमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी प्राथमिक विभागासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक तर माध्यमिक इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन घेतला जातो. परंतु एकंदरीत निकाल हा केवळ साडेतीन टक्के लागलेला आहे.
टीईटी पेपर एक (इयत्ता पहिली ते पाचवी गट) परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या परीक्षार्थींची संख्या ही दोन लाख 54 हजार 428 होती. त्यापैकी केवळ 9 हजार 674 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी ही 3.80% टक्के आहे.
पेपर दोन (गणित विज्ञान इयत्ता सहावी ते आठवी गट) साठी 64,647 शिक्षकांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ 937 परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. या परीक्षेची टक्केवारी 1.45% अशी आहे.
पेपर दोन (सामाजिक शास्त्र इयत्ता सहावी ते आठवी) गटासाठी परीक्षेसाठी एक लाख 49 हजार 604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 6711 परीक्षार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ही 4.49% आहे. एकंदरीत एकूण परीक्षार्थी 46लाख 68 हजार 679 होते. त्यापैकी केवळ 17,322 परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून या एकूण निकालाची टक्केवारी 3.70% अशी आहे.
काही वर्षांपूर्वी राज्यात टीईटी घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर घेतलेल्या या परीक्षेमध्ये एकंदरीत निकालात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.