स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. तसेच शिवसेना नावही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला यांना मिळाले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असताना, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयाने आता शिंदे गटाच्या शिवसेनेला खऱ्या अर्थाने अधिकृत केल्याचा शिक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या गटालाच शिवसेना हे नाव मान्य केले आहे, त्याबरोबरच पक्षाचे अधिकृत असणारे धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदेंच्या शिवसेनेला दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदार सोबत घेऊन बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती.
निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणे अपेक्षित होते. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मानला जात आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू.