56 हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
रविवारी होणार परीक्षेचे आयोजन; शालेय प्रशासनाची तयारी पूर्ण; 4 हजार कर्मचारी राहणार तैनात
या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे 33 हजार 569 विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे 22 हजार 446 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी जिल्हाभरात 380 परीक्षा केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. यात पाचवीचे 223 आणि आठवीसाठीचे 154 केंद्राचा समावेश आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 226 केंद्र संचालक, 6 उपकेंद्र संचालक, 1 हजार 697 पर्यवेक्षक व 448 परिचर असे 2 हजार 377 मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. तर इयत्ता आठवीसाठी 154 केंद्र संचालक, 4 उपकेंद्र संचालक, 1 हजार 129 पर्यवेक्षक व 303 परिचर असे 1 हजार 590 मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.
दोन्ही इयत्तेसाठी सकाळच्या सत्रात प्रथम भाषा 50 गुणांची आणि गणिताचा शंभर गुणांचा पेपर होणार आहे. तर दुपारच्या सत्रात तृतीय भाषा हा 50 गुणांचा, बुध्दिमत्ता चाचणी 100 गुणांची होणार आहे. परीक्षेच्या वैशिष्ट्यात कार्बनलेस उत्तर पत्रिका, बारकोड क्रमांक, सर्व परीक्षार्थ्यांना पेपर 1 मध्ये गणित व पेपर दोनमध्ये बुध्दिमत्ता चाचणी या विषयांची मूळ प्रश्नपत्रिका मुळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येणार असल्याने सेमी इंग्रजी माध्यम असे स्वतंत्र माध्यमाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
प्रश्नपत्रिका या बहुसंच पध्दतीने देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका पेपर 1 व पेपर 2 गुलाबी रंगात राहणार आहे. एका वर्ग खोलीत केवळ 24 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार असून उत्तर पत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव राहणार नसून केवळ बैठक क्रमांक राहणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.