स्वराज न्यूज नेटवर्क
हजारोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चामध्ये सर्वधर्मीय व सर्वपक्षीय लोकांनी पाठिंबा देऊन मोर्चात सहभाग नोंदवला. मराठा आरक्षणासाठी आता सरकारने अंत पाहू नये अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नेवासा येथील मळगंगादेवी मंदिर प्रांगणापासून मराठा क्रांती मोर्चाला प्रारंभ झाला. अग्रभागी घोड्यावर स्वार झालेले मावळे, त्यामागे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, हातात छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज घेतलेले युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक असे या मोर्चाचे स्वरूप होते. जालना येथे मराठा आरक्षण संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात मराठा समाज बांधवांवर लाठीचार्ज करणार्या सरकार व प्रशासनाचा निषेध असो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय रहाणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.. अशा घोषणा मोर्चा प्रसंगी देण्यात आल्या.
मोर्चा बसस्थानक, गणपती चौक, नगरपंचायत चौक, मुख्य पेठेसह डॉ. हेडगेवार चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, औदुंबर चौक मार्गे श्रीरामपूर रोड मार्गे पुन्हा गणपती मंदिर चौकात आला. याठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हजारोंच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना आरतीद्वारे अभिवादन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे अॅड. अण्णासाहेब अंबाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोनई येथील स्नेहल दरंदले, पूनम दरंदले, ऋतुजा रौंदळ, श्रावणी कर्डीले, तेजल गोसावी, साक्षी उभेदळ, ऋतुजा कोकणे, राणी दरंदले, सुहानी भिंगारदे, राहुल पेरणे यांनी भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी 2017 साली आरक्षणाचे गाजर सरकारने दाखवले व स्वतःच त्याचा हलवा खाल्ला, अशी टीका केली. मराठा समाज दगडफेक करणारा नाही तर दगड वाचवणारा असल्याचे सांगत आमचा तवा तापून करपून गेला मात्र आम्हाला आरक्षणाची त्यावर पोळी भाजता आली नाही, अशी भावना व्यक्त केली. आपल्या न्याय हक्कांसाठी व आरक्षणासाठी राजकारण्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली, आरक्षणासाठी सरकारने आता अंत पाहू नये, अशी हाक देत आरक्षण मिळण्यासाठी आता दिल्लीचे तख्त हलविण्याची तयारी ठेवा. त्यासाठी वज्रमूठ बांधा, तुघलकी सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची व भीक नको तर हिसकावून घेण्याची तयारी ठेवा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
निवेदनात मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, कोपर्डीतील आरोपींना फाशी द्यावी, जालन्यातील घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवावा, आंदोलकांवर लाठीमार करणार्या प्रशासनातील दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबित करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.