अहमदनगर आणि आष्टी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गावरील रेल्वेला कोणत्या कारणामुळं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. आग कशामुळं लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी आग लागल्याचं समोर आलं आहे. . अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात त्यांना ४ वाजता यश आलं. या गाडीतील प्रवासी वेळेतच खाली उतरल्यानं बचावले आहेत. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली होती त्यानंतर आगीचं प्रमाण वाढल्यावर एकूण पाच डब्यांना आग लागल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
अहमदनगर आणि आष्टी दरम्यान शिराडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला ही आग लागली आहे. अहमदनगर आष्टी दरम्यानच्या रेल्वे सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्यानं प्रवासी संख्या कमी होती. यामुळं या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन वाजून २४ मिनिटांनी अहमदनगर तालुक्यातील वाळुंज येथे आष्टी अहमदनगर रेल्वेला आग लागली आहे. रेल्वेचे अधिकारी आणि अग्निशामक दल तसेच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
नगर-बीड-परळी या मार्गावर सप्टेंबर २०२२ मध्ये नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या टप्यात रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला दोन गाड्या सोडण्यात येत होत्या. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने सकाळी एकच गाडी सोडण्यात येते. त्यानुसार सोमवार सकाळी नगरहून ही गाडी प्रवासी घेऊन आष्टीला गेली. तेथून परत येत असताना नगर तालुक्यातील वाळूज या गावाजवळ आग लागली.
नगर-सोलापूर महामार्गाच्या क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही. आग लागल्याचे कळताच गाडी थांबविण्यात आली. गाडीत प्रवासी कमी होते. इंजिनच्या मागील दोन डब्यांनी पेट घेतला होता. याची माहिती नगरला कळविण्यात आल्यानंतर रेल्वेचे अधिकारी तसेच महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत आग पाच डब्यांपर्यंत पोहोचली होती. अखेर चार वाजता आग विझवण्यात यश आलं.