हरविलेल्या 19 हजारपेक्षा जास्त मुली, महिला परत
पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश; महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेची माहिती
स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात 5 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे, 2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेने दिली आहे.
राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी 19 हजार 89 महिला घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान अपहरण झालेल्या 5 हजार 495 मुलींचा शोध घेण्यात आला आहे.