कृषीवार्ता
‘मुळा’तील वाळू लिलावासाठी विशेष ग्रामसभा संपन्न
शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळू लिलाव करण्याला परवानगी द्या - प्रांताधिकारी; वाळू म्हणजे आमचं जीवन,वाळू लिलाव तीव्र विरोध - जंगले
स्वराज न्यूज नेटवर्क
पानेगांव : नेवासे तालुक्यातील मुळाथडी परिसरातील शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने विशेष ग्रामसभा आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नगर उपविभागीय प्रांताधिकारी सुधीर पाटील पानेगांव (ता.नेवासे) येथील महादेव सभामंडप ग्रामसभेत बोलत होते. खेडलेपरमानंद, शिरेगांव, पानेगांव, करजगांव, निंभारी आदी गावामध्ये मुळा नदीतील वाळू लिलाव करण्याचा विशेष ग्रामसभा पार पडल्या.
यावेळी पाटील यांनी शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळू लिलाव व डेपो या बाबत सविस्तर सांगितले. पुर्वी हा लिलाव ठेकेदार पद्धतीने असायचा आता आमुलाग्र बदल झालेले असून आपल्याच जनतेला स्वस्त वाळू घरकुल, दवाखाना, रस्ते, इतर बांधकाम असतील यामुळे चोरटी अवैध वाळू उत्खनन थांबवून सहाशे रुपये ब्रासप्रमाणे तेही पारदर्शक, ऑनलाईन पद्धतीने तसेच नदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वाहतूक करणाऱ्या साधनांना जीपीएस प्रणालीद्वारे लाभार्थीपर्यंत घर पोहच केली जाते. ही सर्वच यंत्रणा स्वतः महसूल विभाग अधिपत्याखाली असते. अवैध वाळू विक्री करणारे चार ते पाच हजार रुपये ब्रास विकतात. त्याचबरोबर नदीमध्ये खडखडाट न करता दोन मीटर पात्रात वाळू शिल्लक ठेवूनच वाळू उचलली जाते. त्यामुळे भुजल पातळी काम अविरतपणे सुरु राहते. असे पर्यावरण समितीच्या अहवालानुसार सांगितले आहे.
यावेळी तहसीलदार डॉ संजय बिरादार यांनी नवीन शासनाच्या नियमानुसार वाळू लिलाव करण्यासाठी परवानगी द्यावी, असे ग्रामसभेत सांगितले. यावेळी मुळाचे संचालक पानेगांवचे मा सरपंच संजय जंगले यांनी सांगितले की आमच्या मुळाथडी पट्यात सातत्याने पस्तीस वर्षांपासून विरोध होत असून शासनाने लिलाव करुन सुद्धा महिला पोरा, बाळासह रस्त्यावर उतरले होते. त्यावेळची आठवण करून देवून याच पानेगांव, मांजरीने मिलिटरीच्या गाड्या मागे पाठविल्या होत्या. तसेच मागच्याच सहा महिन्यांपूर्वी अंमळनेर येथील डेपो अख्खा परीसर एकवटून मोठं जनआंदोलन त्यावेळी उभारले होते. शासनाला अखेर अंमळनेर वाळू डेपो स्थगित करावा लागला होता. आमचं जीवन वाळूवर असून एक खडाही उचलू न देण्याचा निर्धार केला. याचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रामराजे जंगले, सुभाष गुडधे, विजय जंगले, किशोर जंगले आदींनी आपल्या भाषणात ठाम विरोध केला.
ग्रामसभेत दिपक पांढरे, मंडल अधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी पतंगे भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, उपसरपंच दत्तात्रय घोलप, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, रमेश गुडधे, सुरज जंगले, बाबासाहेब गुडधे, बबन जंगले, संकेत गुडधे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, कार्यकारी अध्यक्ष किशोर जंगले, दादासाहेब तनपूरे, ज्ञानेश्वर नवगिरे, गणेश चिंधे, गोरक्षनाथ जंगले, बाबासाहेब शेंडगे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, निंभारीचे पोलीस पाटील संतोष पवार, बाळासाहेब जंगले, बारकू जंगले, यमनाथ जंगले अरुण सोनवणे, राजेंद्र शेंडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावामध्ये चोरटी वाहतूक करुन शासनाचा निधी जर बुडणार असेल असं माझ्या निदर्शनास आले तर माझ्या अधिकारात मी वाळू लिलाव/डेपो संमती ठराव करील. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी दक्षता समितीने लक्ष दिले पाहिजे. -प्रांताधिकारी सुधीर पाटील