जून महिन्यात मिळणार तीन महिन्याचे धान्य
रास्तभाव दुकानांत मिळणार ऑगस्टपर्यंतचे अन्नधान्य; पुरवठा विभागाचे निर्देश

मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकाचवेळी तीन महिन्याचे धान्य मिळणार आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्टपर्यंतचे अन्नधान्य ३० जूनपर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उचलावे, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
केंद्र सरकारने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तीन महिन्यांचे रेशनवरील धान्य देण्याची उपाययोजना केली आहे. जिल्हा पुरवठा विभागाला तशा सूचना दिल्या आहेत. पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील धान्य दुकानदारांना तसे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्त्र सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा केला जातो. अंत्योदय रेशनकार्डधारकांना महिन्याला 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब योजना कार्ड धारकांना प्रति मानसी पाच किलो धान्य पुरवठा केला जातो.