ब्रेकिंग
ओव्हरलोड वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई !
धोकादायक ऊस वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : धोकादायक ऊस वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांची प्रथम जबाबदारी साखर कारखान्यांची असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ठामपणे सांगितले. धोकादायक वाहनांकडून ऊस स्वीकारू नये, असे निर्देश त्यांनी कारखान्यांना दिले. त्याचबरोबर ओव्हरलोड वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर, टेललॅम्प, इंडिकेटर अनिवार्य करावेत आणि भुसा-राख वाहतुकीत आच्छादन असावे, अशा सूचना केल्या. विशेष म्हणजे, बैठकीत विचारलेल्या प्रश्नांवर कारखान्यांचे प्रतिनिधी निवृत्त झाले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर सुधारणा करण्यास त्यांनी सहमती दर्शवली.
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रादेशिक सहाय्यक साखर आयुक्त संजय गोंदे, परिवहन अधिकारी विनोद सगरे, प्रादेशिक वन अधिकारी अनंता जोशी यांच्यासह सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन अभिजीत पोटे यांच्या विशेष प्रयत्नाने झाले. पोटे यांनी धोकादायक ऊस वाहतुकीमुळे दरवर्षी २०० पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे आणि शेकडो जण कायमचे अपंग होत असल्याचे वस्तुस्थितीसह मांडले.
ओव्हरलोडिंगला प्रोत्साहन बंद करा – पोटे
अभिजीत पोटे यांनी साखर कारखान्यांनी ओव्हरलोड वाहनांना बक्षीस देऊन सत्कार करणे बंद करावे, अशी मागणी केली. तसेच ऊस वाहतूक करार करताना वाहनांचा विमा, फिटनेस, चालकाचा परवाना आणि फेरबदल तपासावेत, असा आग्रह धरला. ओव्हरलोड ट्रॉली व ट्रकमुळे ग्रामीण रस्ते खराब होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.



