
स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : राज्य शासनाने गरीब कुटुंबांना वर्षांतून मोफत साडी देण्याचा निर्णय घेऊन २०२३ मध्ये वाटपास सुरुवात केली. त्यानंतर लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमुळे हे वाटप ठप्प झाले होते. आता मे महिन्यात पुन्हा साड्या वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील ८६ हजार ९७८ कुटुंबांना साड्या मिळणार आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जानेवारी २०२३ मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थ्यांना वर्षभरातून एकदा मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवित आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाने लाल, हिरवा, पिवळा व निळ्या रंगाच्या साड्यांचा पुरवठा केला होता. त्यानंतर मार्च महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांमधून साड्यांचे वितरण सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील १ हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानांमधून ८३ हजार ४७ साड्यांचे (९४.३३. टक्के) वाटप करण्यात आले होते. लाभार्थी स्थलांतरीत होणे, परगावी असणे आदी कारणांमुळे ४ हजार ९९० साड्यांचे वाटप होणे बाकी होते.
अंत्योदय अन्न शिधापत्रिकाधारकांनाच ही मोफत साडी मिळते. रेशन दुकानातून धान्याप्रमाणेच साड्यांचे वितरण ई-पॉस मशीनद्वारे केले जाणार आहे. मे महिन्यातील धान्याबरोबर साड्या वाटपाचे नियोजन आहे. साडीसमवेत एक कापडी पिशवीही दिली जाणार आहे.



