
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : यावर्षी भारतीय हवामान विभाग तसेच काही आंतरराष्ट्रीय हवामान विभागाने पावसासंदर्भाचे अंदाज व्यक्त केले आहेत. यामध्ये एक वाक्यता दिसून येते. विशेषतः यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. या माहितीचा शेतीच्या नियोजनासाठी उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे.
खरीप हंगामातील बाजरी व सोयाबीन तसेच उडीद, मठ, मूग यांना जास्त पावसाचा फटका बसू शकतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी तूर पिकाला प्राधान्य द्यावे. यावर्षी मार्केटचा अभ्यास करता असे आढळते की, तुरीचे भाव फार चांगले नसले तरी समाधानकारक आहेत व इतर पिकापेक्षा अल्प फायदा घेण्यात तूर यशस्वी झाली आहे. रब्बी हंगामामध्ये गहू किंवा हरभरा पाण्याच्या उपलब्धतेनुसार घेता येतो. तुरीचे नवीन वाण अपेक्षित उत्पादन देण्यामध्ये यशस्वी झाले आहे. तुरीच्या पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी याची काळजी घेतल्यास फारसा कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. तूर मध्यम काळी व भारी काळी जमिनीमध्ये घेता येते व उत्पादन चांगले देते.
खरिप हंगामाची पूर्वतयारी शेतकरी बांधवांनी सुरू केली आहे. तूर पिकासाठी डीएपी खत उत्तम आहे. मध्यम हलक्या जमिनीत शेणखताबरोबर रासायनिक खतांचा वापर करून तुरीचे चांगले उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. खडका गोदावरी बी डी एन या नवीन जाती शेतकऱ्याच्या पसंतीला उतरले आहेत. अशा पद्धतीने सर्वांगीण विचार करता शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाला प्राधान्य देण्यास कोरडवाहू व काही प्रमाणात पाण्याची उपलब्ध असल्यास विचार करण्यास हरकत नाही. असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी दिला आहे.