कृषीवार्ता
मका पिकाचे किडीपासून निर्मूलन केल्यास निश्चित फायदा
डॉक्टर ढगे यांचे प्रतिपादन; औषध फवारणीचे आवाहन

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : खरीप हंगामात सुरुवातीपासून पाऊसमान चांगले असल्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, बाजरी व मका पिकाची वाढ समाधानकारक आहे. तथापि सतत ढगाळ हवामान असल्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मका पिकात अळीसारख्या किडीचे या काळात निर्मूलन केल्यास निश्चित फायदा होईल. त्यासाठी शेतकरी बंधूंनी औषध फवारणी करावी, असे आवाहन शेतावर जाऊन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे विविध ठिकाणी करत आहेत.
प्रभारी मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके, कृषी पर्यवेक्षक प्रशांत कुमार पाटील, प्रगतशील शेतकरी हरदास पाटील यांच्या समवेत काही मका पीक शेताची पाहणी केली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नवीन मका पिकाच्या जातीचा वापर केल्यास पीक 90 ते 100 दिवसात तयार होते. दोन पाण्यावर खरीप हंगामात कमी पाऊस असल्यास त्याची तहान भागते तसेच एकरी 25 ते 30 क्विंटलपर्यंत उत्पादन येऊ शकते.
शेतकऱ्यांनी पशुखाद्य व पोल्ट्री खाद्य कंपन्यांबरोबर करार करून विक्री केल्यास प्रति क्विंटल रुपये 2200 पर्यंत सहज भाव मिळतो. त्यामुळे निश्चित आर्थिक फायदाही होऊ शकतो. तथापि आजच्या प्राप्त स्थितीमध्ये किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असा सल्ला कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी दिला आहे.