आरोग्य व शिक्षण
नेवासा शहरात स्वच्छता अभियानाचे वाजले तीन तेरा
'मी नेवासकर' सामाजिक संघटनेने प्रशासनाला धरले धारेवर; नगरपंचायत कारभाराबाबत नाराजी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील स्वच्छता तसेच पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाल्याने त्रासलेल्या नेवासेकरांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
‘मी नेवासकर’ सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांनी नेवासा नगरपंचायतीच्या घंटागाडी समोर झोपून नगरपंचायतचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नेवासा शहरात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेवासा नगरपंचायतचे अपयश झाकण्यासाठी अधिकार्यांचे उडवाउडवीच्या उत्तरांना नागरिक मोठ्या प्रमाणात वैतागून शहरातील नागरिक आक्रमक झाले. शहरातील एकुण सतरा प्रभागाकरीता घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेवासा नगरपंचायतकडे फक्त तीनच घंटागाडी उपलब्ध आहेत. अपुरे कर्मचारी व मनुष्यबळामुळे शहरातील ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात सर्वत्र निर्माण झालेली अस्वच्छता व दुर्गंधी तसेच अशुद्ध पाणी पिल्याने शहरवासीयांना विविध प्रकारच्या साथीच्या आजारांनी घेरले आहे.
तीन घंटागाडीवर शहरातील सर्व सतरा प्रभागाकरीता घंटागाड्याचे नियोजन होत नसुन पाच सहा दिवसांनी एका एका वार्डात घंटागाडी उपलब्ध होत आहे. ज्या ठेकेदाराला तात्पुरता ठेका दिलेला आहे तो ठेकेदार नेवासा शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकडे फारसे लक्ष देत नाही. नगरपंचायत च्या अधिकाऱ्याला हाताशी धरून सर्व ठेक्याचे बिल काढून निघून जातो. ठेकेदाराकडुन कोण कोण मलीदा खातो व कोणा कोणाला मलिदा घरी पोहच होतो हे नेवासा शहरातील जनतेमध्ये चर्चेतील विषय बनल्याचे विकास चव्हाण यांनी सांगून शहरवासीयांची सहनशीलता संपत चालल्याचे स्पष्ट केले.
शहराला नियमित पिण्यासाठी पाणी नाही. शहरात घनकचरा व्यवस्थापन नाही. शहरात भटकंती जनावरांमुळे परिसरातील नागरिकांना बाजार पेठेत जीव मुठीत धरून जावे यावं लागते. शहरातील स्ट्रीट लाईट पोलवरील लाईट बंद पडलेले आहेत. अशा अनेक प्रश्नांनी नेवासकर त्रस्त आहे. जर संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई न झाल्यास या पुढील आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे असेल असे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांनी सांगितले.
या वेळी डॉ करण घुले, शांताराम गायके, विकास चव्हाण, सतिष गायके, अनिल सोनवणे, किशोर गारुळे, अमृत फिरोदिया, संतोष चव्हाण, फारुख कुरैशी, प्रकाश चव्हाण, मनेष चव्हाणसह आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.