google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती, वापर जपून करावा

डॉ. ढगे यांचे प्रतिपादन, देवगड येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

                                 स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचा वापर काटकसरीने व जपून करावा, असे आवाहन कृषी तज्ञ डॉ अशोकराव ढगे यांनी केले. श्रीक्षेत्र देवगड येथे ‘पाणी व्यवस्थापन’ यावर दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अशोकराव ढगे बोलत होते.

            श्रीक्षेत्र देवगड येथे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय अंतर्गत ग्रामीणस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती नेवासा व नवनिर्माण समाज हितार्थ संस्था, अहमदनगर यांनी केले होते.

              या प्रशिक्षणाला नेवासा तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक विजय जाधव होते.
        डॉ. ढगे यांनी विशद केले की पृथ्वीच्या पाठीवर तीन चतुर्थांश भाग जरी पाण्याने व्यापलेला असला तरी उपलब्ध पाण्याची क्षमता फक्त तीन टक्के आहे. उर्वरित 97 टक्के पाणी क्षारयुक्त व खारवट आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी पाण्याची नियोजन व व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. शेतीसाठी व औद्योगिक कारणासाठी तसेच खाजगी घरगुती वापरासाठी पाण्याची गरज अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची गुणवत्ता प्रदूषणामुळे खराब होत चालली आहे. त्यासाठी पाण्याचा पुनर्वापर आवश्यक आहे. दररोज दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळेल.
            शेतीसाठी पाणी वापर करताना पिकाची गरज पिकाची संवेदनशील अवस्था व पाण्याची उपलब्धता याची सांगड घातली पाहिजे. जास्त पाणी म्हणजे शेतीचे जास्त उत्पादन हा शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे. कमी पाण्यावरच वापसा परिस्थिती शेतामध्ये ठेवता येते. त्यामुळे शेतातील पिके हवा अन्नद्रव्य व पाणी वापसामध्ये चांगले घेऊ शकतात. त्यासाठी सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. विशेषतः मडका सिंचन फळबागेसाठी व तुषार सिंचन चारा पिकासाठी आणि ठिबक सिंचन विविध पिकासाठी उपयुक्त ठरले आहेत. त्यामुळे पाण्याची बचत होते. शेतमालाचे उत्पादन वाढते व विशेषता जमिनीचे आरोग्य चांगले राहते. रासायनिक खतामुळे नाही तर पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी खराब होत आहे व जमिनीचे आरोग्य बिघडत आहे त्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन डॉ. ढगे यांनी केले. याप्रसंगी विशाखा वानखेडे, अश्विनी घरत यांनी सुद्धा पाण्याच्या संदर्भात कृती आराखडा ग्रामपंचायत पातळीवर तयार करण्यासाठी व त्याचा उपयोग खेडेगावासाठी तांत्रिक पद्धतीने करावा याचे मार्गदर्शन केले. कांतीलाल पाटोळे यांनी स्वागत गीत गायन केले. कार्यक्रमाचे डॉ अशोक सावंत यांनी आभार प्रकट केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!